‘भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’; बच्चू कडूंचं विधान
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीय. तर दुसरीकडे महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही आक्रमक भूमिका घेत आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं सांगत भाजपविरोधात रणशिंग फुंकलं आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतो आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या राणाने अपमानित केलं त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही. राजकारणात झीरो झालो तरीही चालेल पण इतकी शरणागती पत्करणार नाही. काहीही झालं तरीही राणांचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे.
हेही वाचा – भाजपकडून अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी, ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार!
भाजपाचाच चांगला उमेदवार आम्हाला मिळाला आहे. उमेदवाराचं नाव जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल. काही दलित बांधवांच्या संघटना, मुस्लिम बांधवांच्या संघटना यांना भेटलो. भाजपातले काही कार्यकर्ते असेही आहेत ज्यांना मोदी हवे आहेत पण खासदार म्हणून राणा नको आहेत. त्यांचीही आम्हाला पाठिंबा द्यायची तयारी आहे. शिवसेनेतलेही काही जण तयार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार असू शकतो, असं बच्चू कडू म्हणाले.
वर्ध्यातले दोन मतदारसंघ अमरावतीत येतात, वर्ध्यात तुम्ही उभे राहा असं सांगितलं आहे. अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला आहे. वर्ध्याचा निर्णयही आम्ही घेऊ. आम्ही असा निर्णय घेण्याचं कारण रवी राणाच आहे. तसंच भाजपाला रवी राणाबाबत अतिप्रेम आहे. भाजपाकडून आम्हाला विचारणा झाली नाही. आम्हाला भाजपाने विश्वासात घेतलं नाही. राणाची दादागिरी जर असेल तर आम्ही त्यांचा पराभव करु. आम्हाला मिळालेला उमेदवार चांगला आहे. भाजपातला माणूस आमच्या साथीला आहे. माझी आणि त्यांची दोन वेळा भेट झाली. आम्ही त्या उमेदवारासह समोर येऊ. महायुतीतून बाहेर पडण्यापेक्षा आम्ही मित्रत्वाच्या नात्याने लढू. बच्चू कडूंनी भाजपाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. जागावाटप करताना कार्यकर्त्यांचाही विचार करावा लागतो. आमचा तर पक्ष आहे, तरीही भाजपाने आमचा विचार केला नाही. ही गोष्ट काही आम्हाला चांगली वाटली नाही, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.