मिझोरामच्या रहिवाशांवर आसाम पोलिसांचा गोळीबार
गुवाहाटी |
आसाम- मिझोराम सीमेवर मंगळवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने दोन्ही राज्यांतील तणाव पुन्हा वाढला आहे. आसाम पोलिसांनी मिझोरामच्या तीन रविवाशांवर गोळीबार केल्याचा आरोप मिझाराम सरकारने केला आहे. आसामच्या हैलाकंदी आणि मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्यादरम्यान झालेल्या या गोळीबारात आपला एक रविवासी जखमी झाल्याचा दावा मिझोरामने केला आहे, तर विरुद्ध बाजूकडून आधी गोळ्या चालवण्यात आल्या असा आरोप आसाम सरकारने केला आहे.
आसाम- मिझोराम सीमेवर तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या उभय राज्यांतील संघर्षात आसाम पोलिसांचे सहा कर्मचारी ठार झाले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा गोळीबार झाला आहे. यावेळी आसामने मात्र आपल्या पोलिसांनी प्रत्त्युत्तरादाखल गोळीबार केल्याचा दावा केला आहे. कोलासिबचे जिल्हा उपायुक्त एच. लालथॅल्न्गीआना यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैरेन्गते येथील तीन जण कोसाबीच्या ऐतलांग ट्लांगपूई भागात आपल्या मित्रांकडून नेहमीप्रमाणे मिळणारे मांस आणण्यासाठी मंगळवारी पहाटे दोन वाजता गेले होते. हा परिसर आंतरराज्य सीमेवर आहे. तेथे त्यांना मोठ्याने शिळ घातल्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज आपल्या मित्रांकडून केला जात असावा, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी त्याला शिळ घालून उत्तर दिले. त्यावेळी तेथे पहाटेचा अंधार होता. सीमेवर आसाम पोलिसांनी तेव्हा गोळाबार करताच हे रहिवासी माघारी फिरले.