धर्माच्या नावानं मतं मागायची? ठाकरे गटाचं पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी उघडपणे धर्माच्या नावानं प्रचार केला त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहलं होतं. या पत्राला निवडणूक आयोगाला अद्याप उत्तर आलेलं नाही. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला स्मरणपत्र लिहलं आहे.
निवडणूक काळात जाहीर प्रचारसभांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून धार्मिक आधारावर उघडपणे केली जाणारी आवाहने, धर्माच्या नावावर मागितली जाणारी मते यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते की नाही याविषयी निवडणूक आयोगानं एकदाचे स्पष्टीकरण द्यावं आणि भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांची पत्र सार्वजनिक का केलं? अजित पवार गटाचा सवाल
आधीच्या पत्रावर आयोगानं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मग, निवडणूक प्रचारात धर्माच्या आणि देव-देवतांच्या नावावर मतदारांना आवाहन करत मते मागण्याची सरसकट परवानगी आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिली आहे, असं आम्ही गृहित धरायचं का? अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत नाही, असं आम्ही मानायचं का? अशी विचारणाही ठाकरे गटानं केली आहे.