‘बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली – सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर अनेक राज्यांनी देखील बारावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने शिक्षण मंडळांना लवकरात लवकर बारावीचा निकाल जाहीर करण्यास सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शिक्षण मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच येत्या 10 दिवसांत अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 20 जुलैला लागणार आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल 31 जुलै रोजी लागणार असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे. तसेच बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र देखील जाहीर करण्यात आलं आहे. परंतू अनेक राज्यांनी 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्याचबरोबर मूल्यमापनाची प्रक्रिया जाहीर केलेली नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे चांगलेच कान खेचले आहेत.
दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने जुलै महिन्यात बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, इतर राज्यांच्या परीक्षा रद्द झाल्या असताना आंध्र प्रदेशला वेगळं काय सिद्ध करायचं आहे?, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला आहे.