‘एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा’; ठाकरे गटाची टीका
![An exit poll is like redis cut in Guwahati, says the preface of the saamana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Narendra-Modi-and-Uddhav-Thackeray-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणूकीचा निकाल उद्या (4जून) जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी अक्झिट पोलचे अंदाजदेखील जाहीर झाले आहेत. त्यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, अशी शक्यता आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटने एक्झिट पोलच्या अंदाजावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून ही टीका करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील हेसुद्धा सांगून टाकले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांच्या मतदानासंदर्भात संपूर्ण ‘डाटा’ बाहेर आलेला नाही. त्यामुळे या राज्यांत काय निकाल लागतील, त्याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही, पण या सगळ्या राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्त ठोकून दिले की, पुन्हा एकदा मोदीच येत आहेत.
भाजपाला ३५० जागा मिळाव्यात असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवलेले नाही. २०१४ आणि २०१९ पेक्षा मोदींना लोक भरभरून मते देत आहेत व मोदी तिसऱ्यांदा विजयी होत असल्याचे चित्र निर्माण करणे हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ आहे, असेही ते म्हणाले. तसेच १ तारखेला पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. पश्चिम बंगालातील १० जागांसाठी साधारण ५९.१५ टक्के मतदान झाले. आता निवडणूक आयोग चार-पाच दिवसांनी या आकड्यात आणखी पाच-दहा टक्क्यांची भर टाकेल. मग एक्झिट पोलवाल्यांनी पश्चिम बंगालमधील निकाल कोणत्या आधारावर लावले?
हेही वाचा – तुरुंगात जाण्यापूर्वी एक्झिट पोलवर मोठं विधान; अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
हरियाणात एकूण १० लोकसभेच्या जागा असताना तेथे भाजपप्रणीत एनडीएला १६ ते १९ जागा मिळतील असे ‘झी न्यूज’च्या एक्झिट पोलमध्ये दाखवले. हिमाचल प्रदेशात फक्त चार जागा असताना या राज्यात एनडीए सहा ते आठ जागा जिंकेल असा निकाल दिला आहे. बिहारमध्येदेखील लोक जनशक्ती पार्टी प्रत्यक्षात पाच जागांवर लढलेली असताना एक्झिट पोलमध्ये तो पक्ष सहा जागा जिंकू शकेल असे ठोकून दिले आहे. झारखंडमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकच जागा लढवत असताना त्या पक्षाला तीन ठिकाणी विजय मिळेल, असा ‘चमत्कार’ एक्झिट पोलवाल्यांनी केला आहे. हा सर्व आकड्यांचा बनावट खेळ आहे. देशातल्या जनतेचा मूड आणि हे एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाहीत.
४ जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपावाले सांगत आहेत. मात्र, मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत. त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे”, असेही ते म्हणाले. तसेच “भाजपा २२५ जागांच्या पुढे जात नाही व इंडिया आघाडी २९५ ते ३१० जागा जिंकून सरकार स्थापन करेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. “एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकीन है! मोदी जात आहेत हाच ४ जूनचा खरा निकाल आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.