खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील आमने-सामने
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाद सुरु आहे. हा वाद थांबण्याची चिन्हं नाहीत. हा वाद एवढा शिगेला पोहचलाय की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं. त्यामुळे आता या दोघांमधला वाद सरकारवर परिणाम करतो का याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला. अमोल कोल्हेंच्या या ‘सिधी बात’ मुळे शिरुरमधीलवाद पुन्हा उफाळण्याची चिन्हं आहेत.
खेड घाट बायपासच्या कामाच्या श्रेयाची चोरी करुन वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला. इतकंच नाही तर त्यांनी शिवसैनिकांसमवेत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला.
खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले होते. त्यावेळी आपण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज अखेर बाह्यवळणाचे काम झालं आहे. अशा वेळी अचानक उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला. या कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत, असा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.