एसटी महामंडळाचे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संपात सहभागी; एसटीच्या २ हजार फेऱ्या बंद
- एसटीच्या २ हजार फेऱ्या बंद; रोजच्या ६० लाखांच्या उत्पन्नावर पाणी
नगर |
एसटी महामंडळाचे जिल्ह्यातील सर्व म्हणजे सुमारे ४५०० वर कर्मचारी आज, मंगळवारपासून संपात सहभागी झाल्याने सर्व आगारातील एसटी बससेवा ठप्प झाली आहे. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होऊ लागले आहेत. महामंडळाचे जिल्ह्यातील रोजचे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत ऐन दिवाळीत संप सुरू केला. नंतर तो मागेही घेण्यात आला होता. मात्र महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी अमान्य झाल्याने पुन्हा संप सुरू करण्यात आला.
या काळात केवळ जामखेड आगारातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. नंतर संपाचे लोण इतरही आगारात पसरले व टप्प्याटप्प्याने आता जिल्ह्यातील सर्व म्हणजे ११ आगारातील व दोन कार्यशाळांतील (सर्जेपुरा व तारकपूर) सुमारे साडेचार हजारावर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी अपापल्या संघटना बरखास्त करत एकत्रितपणे आपापल्या आगारापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोज होणाऱ्या एसटी बसच्या दोन हजारावर फेऱ्या बंद पडल्या आहेत. परिणामी हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. बस स्थानकांवर शुकशुकाट जाणवत आहे. जिल्ह्यात एसटी महामंडळाला रोजचे ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, ते संपामुळे आता बुडत आहे. करोना टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. त्यानंतर हळूहळू बससेवा पून्हा पूर्वपदावर येऊ लागली होती. परंतु आता संपामुळे पुन्हा महामंडळाला मोठा फटका बसत आहे.