विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावरून बावनकुळेंचा अजित पवारांना टोला
अजित पवारांचे राजकारणातून सन्यास घ्यायचे दिवस येतीलच
नागपुर : राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधीपक्षातील नेत्यांना बोलू न दिल्याने विरोधकांकडून विधान सभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांत आणखी संघर्ष वाढणार आहे. विधान सभा अध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची खिल्ली उडवली आहे.
विरोधकांकडून अविश्वास ठराव आणायचाच होता तर तो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बॉम्ब आहे, विरोधकांचे वीस पंचवीस आमदार पुन्हा येणार आहे. 184 च्या वरती मतदान मिळतील. भावनात्मक पद्धतीने मिस अंडरस्टॅंडिंग करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे आणि तेच हे लोक करत आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
अखंड महाराष्ट्राचा विकास कसा होईल. सरकारच्या वतीने जनतेसाठी काय करता येईल. विदर्भासाठी काय करता येईल. मराठवाड्यासाठी काय केलं पाहिजे. यावर चर्चा अपेक्षित होती. तसं झालं नाही. विरोधक टाईमपास करतात. विरोधक दुतर्फि भूमिका घेत आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
अजित पवार यांनी आम्हाला चॅलेंजच दिलाय. त्यांनी म्हटलंय की, करेक्ट कार्यक्रम करायचा. तर आम्ही वाट बघतोय. बारामती शहराच्या नावाने 10 हजार कोटी रुपयांच्यावर पैशांचा दुरुपयोग झाला. अनेक गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत. पण वेळ आली की सांगू. पण त्यांना नक्कीच राजकारणातून सन्यास घ्यायचे दिवस येतीलच, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
विरोधकांकडून विधान सभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दिला जाणार आहे. या ठरावाबाबत विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देखील देण्यात आले आहे. मात्र या पत्रावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नसल्याने महाविकास आघाडीत फुट पडली आहे का? अशी चर्चा देखील सध्या रंगली आहे.