#CoronaVirus: भारताची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक तूर्त बंद राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेने घेतलेला हा निर्णय देशाची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होताना दिसते आहे. यापूर्वी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलत संपूर्ण रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारला विश्वासात घेऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २२ ते मार्चच्या मध्यरात्रीपासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत प्रवासी सेवा पूर्णपणे बंद राहिल असे, ते म्हणाले. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या काहीजणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. विनाकारण प्रवास टाळा अशा सूचना केंद्र तेसच राज्य सरकारकडून देण्यात आल्या असताना देखील लोक बाहेर पडत होते. आता रेल्वे वाहतूक सेवाच बंद करुन सरकारने लोकांसमोरील पर्याय बंद करुन कोरोना विषाणूला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचचले आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर राज्यातील लोकल सेवाही बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून इतर सार्वजनिक वाहतूकही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय टप्प्याटप्याने घेतले जाण्याची शक्यता आहे.