आंध्र प्रदेश सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा निर्णय
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाच उपमुख्यमंत्री अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील असणार आहेत. जगमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधीमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली. देशात पहिल्यांदाच एखाद्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असणार आहेत. याआधी चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात दोन उपमुख्यमंत्री होते. यामधील एक मागासवर्गीय जाती आणि दुसरे कापू समाजातील होते.
मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये पार पडलेल्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकांच्या अपेक्षा लक्षात घेता आपण नवीन मंत्र्यांची नियुक्ती करत असल्याचं सांगितलं. शनिवारी २५ जण मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती जगमोहन रेड्डी यांनी दिली आहे.
अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं जगमोहन रेड्डी यांनी सांगितलं आहे. आपल्या कामगिरीवर लोकांचं बारीक लक्ष असल्याने त्यांच्या समस्यांकडे नीट लक्ष देऊन सोडवा अशी सूचना जगमोहन रेड्डी यांनी नेत्यांना केली आहे. आपल्या आणि आधीच्या सरकारमध्ये काय फरक आहे हे लोकांना दाखवून देणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.