उमेदवार तुम्ही सर्वजण बसून ठरवा, पण नवीन चेह-याला संधी द्या – शरद पवार
- पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा जिंकून आणा
- अडीच महिने बसू नका, लोकांकडे जनसंर्पक वाढवा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकांना तेच तेच चेहरे नको असतात. नवे चेहरे दिले तर लोक बदल स्विकारायला तयार होतात. जे लोक काम करतात. तेव्हा लोक त्यांना मदत करतात. त्यामुळे अडीच महिने काहीच करु नका. सगळ्यांनी संपर्क वाढवा. जास्तीत जास्त लोकांना भेटा. आपल्या चुका समजुन घ्या. त्या चुका दुरुस्त करुन कामाला लागा. तसेच उमेदवार तुम्ही सर्वजण बसुन ठरवा. पण हुता व्हुईल तेवढं, नवीन चेह-याला संधी देवून तिन्हीही जागा जिंकून आणा, असा आदेश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार यांनी दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज (गुरुवारी) भोसरी एमआयडीसीतील हॉटेल पर्ल येथे पदाधिका-यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, मयुर कलाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, मतदारांना दोष न देता. आपली चुक मान्य करायची, झालेल्या चुका दुरुस्ती करायच्या. आपल्याला का नाकारतात? याचा विचार करा. चूका दुरुस्त करुन लोकांमध्ये जा. चुक दुरुस्त करुन लोकांमध्ये गेल्यास ते स्वीकारतात.
विधानसभा निवडणुकीला फक्त 98 दिवस राहिले आहेत. आजपासूनच कामाला लागा. सर्वांनी एकत्र बसून जबाबदारी वाटून घ्या. त्यादृष्टीने कामाला लागा. जो प्रभाग दिला आहे. त्या प्रभागातील मतदारांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. कोण घरी आहे, कोण बाहेरगावी गेले आहेत. कोणाला भेटलात कोणाला भेटला नाहीत?. त्याचे टिपण करा. प्रत्येक घरातील कुटुंबाची माहिती घ्या. प्रत्येकाला वैयक्तिक भेटा, आत्तापासूनच घरोघरी जाऊन मतदारांना भेटल्यास मतदार ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न उपस्थित करणार नाहीत.
तसेच आरएसएसचे लोक कसा प्रचार करतात? हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले. त्यातील एखादे घर बंद असेल. तर, ते संध्याकाळी त्या घरी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात. पण दिलेली जबाबदारी योग्य पध्दतीने निभावतात. त्यामुळे संर्पक आणि चिकाटी सोडत नाहीत. असे शिस्तबंध काम करतात. त्याचे अनुकरण करुन आपण देखील अशा पद्धतीने जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे.
”काही वर्षांपुर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेतले जात होते. महापालिका आपल्याकडे होती. मी देशात फिरतो. शहरातून देखील जाण्याचा प्रयत्न करतो. शहरातून अनेकदा जाणवते, पुण्यापेक्षा शहरात जास्त सुधारणा झाला आहे. रस्ते, उद्याने सुधारली आहेत. पुण्यापेक्षा पिंपरी महापालिकेचा विकास चांगला झाला. त्याचे श्रेय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. तीनवेळा जनतेने आपल्याला महापालिकेत सत्ता दिली. मागच्या वेळेला धक्का बसला. याचे आश्चर्य वाटले’, असेही शरद पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या विविध कोप-यातून लोक स्थायिक झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शहरात वास्तव्यास आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेत, निवडणुकीत त्यांना संधी देण्यात यावी. पिंपरी-चिंचवडनगरी कामगारांची नगरी आहे. त्यामुळे कामगार क्षेत्रातील लोकांना देखील संधी देण्याची सूचनाही पवार यांनी केली.