फक्त निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर राहीन – पार्थ पवार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, अशी प्रतिक्रिया पार्थ यांनी ट्विटरवर दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पराभव केला. या पराभवानंतर तब्बल पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये पार्थ यांनी मावळमधील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल व महाआघाडीतील सर्व सदस्यांनी निवडणुकीत केलेल्या कठोर परिश्रमासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो, असे लिहिलं आहे. त्याशिवाय फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन असेही आश्वासनही जनतेला दिले आहे.
https://twitter.com/parthajitpawar/status/1133334216358236161
दरम्यान, नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवारच्या पराभवावर भाष्य केलं. “मावळमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे. जनतेने या निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. दुष्काळाची समस्या मोठी आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा याबाबत आम्ही चर्चा केली” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.