पाण्याचं महत्व पटवून देणाऱ्या ‘H2O ‘चा टीझर प्रदर्शित
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. मात्र या गरजांपैकी पाण्याचं महत्व सर्वात जास्त. परंतु आजच्या घडीला सर्वत्र पाण्याची समस्या निर्माण झाली. त्यातच ऋतू बदलत असल्यामुळे आता उन्हाचे चांगलेच चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पाण्याचं महत्व पटवून सांगणारा H2O हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून आता त्याचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कहाणी थेंबाची या नावाची टॅगलाईन घेऊन ‘H2O’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या विषयावर हा चित्रपट भाष्य करणारा असल्याचं प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येत आहे.
दरम्यान, या टीझरमध्ये काहीतरुण-तरुणी गावामध्ये श्रमदान करतानाही दिसत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात केवळ दुष्काळावर भाष्य करण्यात येणार नसून प्रेम, मैत्री, वादविवाद यांच्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यासोबतच तरुणाईकडून समाजप्रबोधनही उत्तमरित्या रेखाटण्यात आलं आहे.
हल्ली तरुण पिढी शहराकडे आकर्षित होत असतानाच हे तरुण आपल्या गावात जाऊन श्रमदान करताना दिसत आहेत. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. जी. एस. फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद पाटील यांचे असून सुनील झवर यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. अशोक एन.डी, सुप्रित निकम, धनंजय धुमाळ, शितल अहिरराव, किरण पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.