पिंपरीतील त्या भाषणावर काय म्हणाले पार्थ पवार?, दिले चोख प्रत्युत्तर
पिंपरी (महा-ई-न्यूज) – बोलण्यापेक्षा मी नागरिकांची कामे करण्यावरच अधिक भर देतो, अशी प्रतिक्रिया मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाची सोशल माध्यमातून खिल्ली उडविणा-यांना ही चपराक दिली आहे. तसेच, मला खोटी आश्वासने देता येत नाही. नागरिकांची कामे झाली पाहिजेत. ती पूर्ण करण्यावर अधिक भर देतो. आजकाल खोटं बोलणा-यांची संख्या अधिक आणि नागरिकांची कामे करणा-यांची संख्या कमी झाली आहे, अशा शब्दांत पार्थ पवार यांनी बोलघेवड्या आणि खोटी आश्वासने देऊन नागरिकांची फसवणूक करणा-या भाजप नेत्यांचा देखील त्यांनी समाचार घेतला.
- मावळ मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित रविवारी फोडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या सभेत सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष पार्थ पवार यांच्या भाषणाकडे लागले होते. त्यांचं भाषण अडखळत झाल्याने विरोधकांसह राजकीय क्षेत्रातून त्यांच्या भाषणाची खिल्ली (ट्रोल) उडवण्यात आली. मात्र, यावर आज बुधवार (दि. 20) पार्थ पवार यांनी खिल्ली उडवणा-यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो, असे त्यांनी म्हटले आहे. वडगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
पार्थ पवार म्हणाले, माझं ते पहिलं भाषण होतं, एक-दोन चुका झाल्या. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यावरच मी लक्ष केंद्रीत करायला हवं. काही लोक चांगली भाषणं करतात. मात्र, काम करीत नाहीत. माझी काम करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो. नाहीतर खोटं बोलणा-यांची संख्या अलिकडे खूपच वाडली आहे. खोटं बोलून नागरिकांची फसवणूक करायची. दिलेली आश्वासने पूर्ण करायची नाहीत, ही पध्दत आता नागरिकांच्या लक्षात आली आहे. गेल्या पाच वर्षात ज्यांनी खोटं बोलून नागरिकांचा विश्वासघात केला त्या निष्पाप लोकांना मी कदापी फसवणार नाही. मी बोलेन कमी पण नागरिकांच्या कामांना पहिले प्राधान्य देईल. ही माझी काम करण्याची पध्दत आहे. त्यामुळे कुणी कितीही ट्रोल केले तरी माझ्या कामावर फरक पडणार नाही, असेही पार्थ पवार म्हणाले.