खासदार शिवाजी आढळराव-पाटलांनी शिरुरमध्ये काय दिवे लावले? – माजी आमदार विलास लांडे यांचा सवाल
- भोसरीतील गावजत्रा मैदानावर डागली तोफ
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षात मतदार संघात काय दिवे लावले हे सर्वांना माहित आहे. सर्वांना खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं. कामगारांच्या समस्या, दिन दलितांच्या समस्या वाढल्या, कारखानदारीत गुंडगिरी चालते, अशी परिस्थिती मतदार संघात आहे, अशा शब्दांत माजी आमदार विलास लांडे यांनी खासदार आढळराव पाटील यांच्यावर तोफ डागली.
शिवसेनेचे उपनेते अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भोसरीत त्यांच्या उपस्थितीत पहिला मेळावा आज पार पडत आहे. विविध प्रश्नांवरून सरकारचा पंचनामा करणारी चित्रफित देखील यावेळी दाखविण्यात आली. यावेळी व्यासपीठावरून बोलताना माजी आमदार लांडे यांनी पोलखोल केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक जालिंदर शिंदे, वसंत लोंढे, अभिनेते अमोल कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.
लांडे म्हणाले की, पुणे नाशिक रस्ता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्याचे श्रेय हा खासदार घेत आहे. प्रवाशांना, रुग्णांना या खासदाराने वेठीस धरले आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये शरद पवार यांनी लक्ष घातलं. बैलगाडा शर्यतीच्या परंपरेवर शेतक-यांच्या प्रतिक्रिया घेतलेली चित्रफित लांडे यांनी सादर केली. येणा-या लोकसभा मतदार संघात जनता आपल्या पाठिशी उभे राहणार याची मला खात्री आहे, असेही लांडे म्हणाले.