मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची बैठक
- अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला 100 कोटी देण्याचे दिले आदेश
- लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीसाठी भूसंपादनाचे दिले आदेश
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची बैठक मुख्यमंत्री देवेन्द्र फडणीवस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत समितीचे सचिव राज्यमंत्री मधुकर कांबळे यांनी स्मारकाच्या आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा सादर केला. स्मारक कसे असावे या विषयाची चित्रफीत दाखविण्यात आली. स्मारकाची पुढील कामे आणि त्यासाठी लागणा-या निधीची मागणी त्यांनी यावेळी केली.
स्मारक समितीचे सदस्य अमित गोरखे यांनी स्मारक समितीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून शासकीय लेखाधिकारी नेमा, तसेच शासन स्तरावर स्मारकाचे बांधकाम विकासक न नेमता पूर्ण करावे. आहे त्या ऐतिहासिक जागी स्मारकाचे काम त्वरित चालू करावे, अशी मागणी केली.
अमित गोरखे यांनी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती मोहोत्सवाला १०० कोटी रुपये शासनाने अनुदान द्यावे व पुण्यातील क्रांतिवीर लहुजी स्मारक समितीसाठी जमीन हस्तांतरित करण्यासाठी निधी व शासकीय कार्यालय पुणे येथे चालू करावे, अशी सूचना केली. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थकीत कर्ज केंद्राला देऊन समाजातील वंचित कुटुंबाना त्वरित हवे त्याला कर्ज योजना महामंडळाच्यातर्फे चालु करावी, अशी सूचना त्यानी मांडली. अण्णाभाऊंचे साहित्य प्रकाशन समिती पुनर्स्थापित करून पुढील साहित्य त्वरित छपाई करावी असेंही गोरखे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बार्टीमार्फत समितीला त्वरित निधी उपलब्द्ध करा. स्मारकाचे काम विकासकाऐवजी स्वतः शासनाच्या बांधकाम विभागाने करावे. जेणेकरून कामात कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही. अण्णाभाऊंची जयंती खूप जल्लोशात साजरी करण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीसाठी आरक्षित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया त्वरित राबवून मूळ मालकांना त्यांचा परतावा ताबडतोब द्यावा. जेणेकरून स्मारकाचे काम लवकर चालू करता येईल. लहुजींच्या स्मारक समितीलाही निधी त्वरित उपलब्ध करा, असे आदेशही त्यांनी दिले.
बैठकीत समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दिलीप कांबळे, समितीचे सदस्य आमदार श्रीकांत देशपांडे, संजय कुटे, सुधाकर भालेराव, अमित गोरखे, शंकर कांबळे, समाजकल्याण, मनपा तसेच बार्टीचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.