राज्यातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबणीवर!
पुणे – राज्यातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबणीवर पडणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अद्याप सुरुवात करण्यात आली नसल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विधीच्या प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून विधी, बीएड, एमएड, बीपीएड या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार सीईटी घेण्यात आली. पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झाले आहेत. मात्र तीन वर्षीय विधी अभ्यासक्रम प्रवेश रखडले आहे. मे महिन्यात सीईटी होऊन अद्याप प्रवेशाला सुरुवात न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक व्ही. आर. मोरे म्हणाले, मागील आठवड्यात सामाईक प्रवेश कक्षाची बैठक झाली. त्यात मुंबई विद्यापीठासह आणखी काही विद्यापीठाने पदवीचे निकाल जाहीर झाले नाहीत. त्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला काही अडचण नाही. पण तीन वर्षीय विधीच्या प्रवेशासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची क्षमता राज्यात 15 हजार 220 इतकी आहे. या परीक्षेच्या सीईटीसाठी 27 हजार 342 विद्यार्थी परीक्षा दिली होती. ही परीक्षा 21 मे रोजी घेण्यात आली होती. जवळपास प्रवेश क्षमतेचा विचार करता सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे विधीचे प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागणार आहे. मात्र प्रत्यक्ष प्रवेशाला अजून सुरुवात न झाल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.