राम मंदिर फक्त आम्हीच उभारु शकतो, दुसरं कोणी नाही – योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. अयोध्येत जर कोणी राम मंदिर उभारु शकतं तर तो फक्त भाजपा पक्ष असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. भाजपा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली.
‘अयोध्येत जर कोणी राम मंदिर उभारु शकतं तर ते फक्त आम्हीच…कोणी दुसरं नाही’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘मत त्यालाच देणार जो मंदिर उभारणार’, अशी घोषणा यावेळी कार्यकर्ते करु लागले.
पुढे बोलताना योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर टीका केली. ते म्हणाले की, ‘काहीजण आपण ‘जनेऊ धारी’ असल्याचं तसंच गोत्र सांगत लोकांची दिशाभूल करत आहेत’. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाचा अनपेक्षित पराभव झाला. महत्त्वाचं म्हणजे योगी आदित्यनाथ यावेळी भाजपाचे स्टार प्रचारक होते. राम मंदिरासाठी आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेकडून वारंवार भाजपावर दबाव आणला जात असून अशावेळी योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याचे अनेक अर्थ निघू शकतात.