नरेंद्र मोदी टीम लीडर नाहीत, जनता पुन्हा मत देणार नाही – मेघनाद देसाई
जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अनेक जण आवाज उठवू लागले असून जाहीर टीका करत आहेत. भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांनीदेखील नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत नाराज झालेली जनता पुन्हा त्यांच्या पक्षाला मत देणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी योग्य टीम लीडर नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मेघनाद देसाई यांनी म्हटलं आहे की, ‘नरेंद्र मोदींनी गरजेपेक्षा जास्त आश्वासनं दिली. सोबतच एक मजबूत मंत्रिमंडळ असण्यापेक्षा काही निवडक अधिकाऱ्यांच्या सहाय्याने हा देश चालवू हा विश्वास त्यांना नडला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही पद्धत अवलंबली होती. अखेर जनता निराश झाली. अजूनपर्यंत अच्छे दिन आले नसल्याची भावना लोकांच्या मनात येऊ लागली आहे’.
पंतप्रधान मोदींकडे खूप चांगली संधी होती, पण सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याची भावनाच नसल्याने ते काही करु शकले नाहीत असं मेघनाद देसाई यांनी म्हटलं आहे. मेघनाद देसाई यांनी मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘मोदी एक उत्तम राजकारणी आहेत, पण चांगले टीम लीडर नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज आणि अरुण जेटली वगळता कोणाकडे जास्त अनुभव नाही. पुन्हा सत्ता मिळण्यासाठी आपल्याला इतके परिश्रम घ्यावे लागतील याची मोदींना कल्पनाही नव्हती. तीन राज्यांमध्ये झालेला पराभव मोदींना धडा शिकवणारा आहे’.
यावेळी मेघनाद देसाई यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं कौतूक केलं. नरेंद्र मोदींशी तुलना करता मनमोहन सिंह जास्त योग्य आणि अनुभवी असल्याचं त्यांनी म्हटलं. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी, अर्जून सिंह, शरद पवार आणि पी चिदंबरम यांच्यासहित अनुभवी नेते होते अशी आठवण त्यांनी करुन दिली.
आरबीयसंबंधी सुरु असलेल्या वादावरुनही मेघनाद देसाई यांनी मोदींवर टीका केली. दोन गव्हर्नर अशा पद्धतीने जाणं चांगली गोष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.