पारंपरिक मतदारसंघांतच काँग्रेसकडे प्रभावी उमेदवारांची वानवा!
राज्याच्या स्थापनेपासून २०१४ चा अपवाद वगळता सांगली आणि नंदुरबार हे दोन मतदारसंघ कायम काँग्रेसच्या ताब्यात होते. हे दोन्ही मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असली तरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे सक्षम उमेदवारांची वानवा आहे. दुसरीकडे राज्यातील काँग्रेसच्या विद्यमान दोन्ही खासदारांची पुन्हा लोकसभा लढण्याची तयारी दिसत नाही.
सांगली आणि नंदुरबार हे दोन लोकसभा मतदारसंघ १९६२ पासून सातत्याने काँग्रेसने जिंकले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवारांचा भाजपने पराभव केला. विशेष म्हणजे भाजपच्या वतीने निवडून आलेले दोन्ही खासदार हे मूळचे काँग्रेस वा राष्ट्रवादीची पाश्र्वभूमी असलेले होते. सांगलीतून निवडून आलेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी निर्माण झालेल्या राजकीय वादातून संजयकाका भाजपवासी झाले. मोदी लाटेत सांगली मतदारसंघातून तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव करून विजयी झाले. नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री विजय गावित यांची हिना ही कन्या असून, मुलीच्या खासदारकीसाठी गावित यांना मंत्रिपद सोडावे लागले. सांगलीतील संजयकाका पाटील आणि नंदुरबारच्या हिना गावित हे दोन्ही खासदार मूळचे राष्ट्रवादीचे. भाजपवासी झाले आणि खासदारकी मिळाली.
काँग्रेसला या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. सांगलीत उमेदवारीसाठी माजी खासदार प्रतीक पाटील हे इच्छुक असले तरी पक्षाचे नेते त्यांना उमेदवारी देण्याबाबत फार उत्सुक दिसत नाहीत. युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजीत कदम यांनी लोकसभा लढवावी, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर विश्वजीत यांनी राज्याच्या राजकारणात राहणे पसंत केले आहे. लोकसभेवर जाण्यासाठी विश्वजीत फारसे उत्सुक नाहीत. विश्वजीत लोकसभा लढण्यास तयार नसल्यास उमेदवारी कोणाला द्यायची हा काँग्रेसपुढे प्रश्न आहे.
विश्वजीत यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी म्हणून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांची इच्छा दिसत नाही. काँग्रेससाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने त्यांच्याच गळ्यात उमेदवारी टाकली जाईल, अशीही शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विश्वजीत यांनी पुणे मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. पण मोदी लाटेत त्यांचा निभाव लागला नव्हता. विश्वजीत तयार न झाल्यास कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेसपुढे मोठा प्रश्न आहे.
नंदुरबार मतदारसंघातून माणिकराव गावित यांनी विक्रमी नऊ वेळा विजय संपादन केला होता. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला. माणिकराव गावित यांचे आता वय झाले असून, त्यांना पर्याय कोण याचा अंदाज पक्षाच्या वतीने घेतला जात आहे. माणिकराव गावित हे मुलाला उमेदवारी द्यावी म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यांची कन्या निर्मला गावित या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. काँग्रेसमध्ये अक्कलकुवाचे आमदार के. सी. पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. पण सांगलीत विश्वजीतप्रमाणेच नंदुरबारमध्ये के. सी. पाडवी हे लोकसभा लढण्यास उत्सुक नाहीत.
विश्वजीत कदम अनुत्सुक
सांगलीत उमेदवारीसाठी माजी खासदार प्रतीक पाटील हे इच्छुक असले तरी पक्षाचे नेते त्यांना उमेदवारी देण्याबाबत फार उत्सुक दिसत नाहीत. युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजीत कदम यांनी लोकसभा लढवावी, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली आहे. मात्र, लोकसभेवर जाण्यासाठी विश्वजीत फारसे उत्सुक नाहीत. विश्वजीत यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी म्हणून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेससाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने त्यांच्याच गळ्यात उमेदवारी टाकली जाईल, अशीही शक्यता आहे.
दोन्ही खासदार रिंगणापासून दूर?
गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते. नांदेडमधून अशोक चव्हाण तर शेजारील हिंगोलीतून राजीव सातव यांनी विजय संपादन केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राज्याच्या राजकारणात परतण्याचे वेध लागले असून, त्यांची पसंती विधानसभेला आहे.
नांदेड लोकसभेसाठी पत्नी अमिता यांना उतरविण्याची अशोकरावांची योजना आहे. पक्षांतर्गत सत्तासंघर्षांत अशोक चव्हाण यांच्याशी बिनसल्याने राजीव सातव हे सुद्धा लोकसभा लढण्याबाबत उत्सुक नाहीत.
सातव यांच्याकडे गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी असल्याने त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघात अडकून पडायचे नाही. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करूनच सातव हे पुढील निर्णय घेणार आहेत. दोन्ही विद्यमान खासदारांनी लढण्याबाबत असमर्थतता व्यक्त केली असली तरी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी हेच अंतिम निर्णय घेतील. निवडून येण्याची क्षमता यावरच निर्णय घेतला जाईल.