Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शाळा-महाविद्यालयांत योग शिक्षकांची स्वतंत्र पदे निर्माण करा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

योगाला शिक्षणव्यवस्थेचा नियमित भाग बनविण्याचे आवाहन; योगाच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यावर भर

पुणे : भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाला शाळा-महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात पात्र योग शिक्षक अथवा प्रशिक्षकाचे स्वतंत्र पद निर्माण केले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासोबतच प्रशिक्षित योग व्यावसायिकांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेत स्वामी कुवलयानंद यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, कैवल्यधामचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि प्रबंधक परिषदेच्या सदस्या पुष्पा मांडके उपस्थित होत्या.

राज्यपाल म्हणाले की, भारताकडे मोठ्या प्रमाणात युवा शक्ती असून तिचा योग्य वापर केल्यास तो देशाचा मोठा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ठरू शकतो. योगामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, शारीरिक तंदुरुस्ती, भावनिक संतुलन आणि आत्मजागरूकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे योग हा केवळ अधूनमधून केला जाणारा उपक्रम न राहता शिक्षणव्यवस्थेचा नियमित भाग झाला पाहिजे.

योगातून रोजगाराच्या नव्या संधी

योगाच्या माध्यमातून जागतिक योग आणि वेलनेस अर्थव्यवस्था उभारण्याची भारताला मोठी संधी आहे. योग पर्यटन, प्रशिक्षण, संशोधन, डिजिटल व्यासपीठे, उपकरणे, वस्त्रे आणि विविध सेवांच्या माध्यमातून एमएसएमई, स्टार्टअप, महिला उद्योजक, कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात. योगाच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत @२०४७’च्या उद्दिष्टांना चालना देता येईल, असे वर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा –  गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या विकासाला गती; आफ्रिकन सफारीच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडून आढावा

कैवल्यधामने विद्यापीठांशी भागीदारी करावी

कैवल्यधाम ही केवळ योग संस्था नसून भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देणारी संस्था आहे. स्वामी कुवलयानंद यांनी १९२४ मध्ये कैवल्यधामची स्थापना करून योगाच्या वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधनाची पायाभरणी केली. त्यांनी सुरू केलेले ‘योग मीमांसा’ नियतकालिक आजही प्रकाशित होत असल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

कैवल्यधामने राज्यातील विद्यापीठांशी शैक्षणिक भागीदारी करावी. योग अभ्यासक्रम तयार करणे, शिक्षकांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देणे, संशोधन करणे आणि विद्यार्थी जीवनात योगाचा समावेश करण्यासाठी विद्यापीठांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतासह जगभरात केंद्रांचा विस्तार करून देशातील इतर जुन्या योग संस्थांना सोबत घेत राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

योगातून जगाला शांततेचा संदेश द्यावा : सुरेश प्रभू

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी योगाच्या माध्यमातून शांततेचा संदेश जगभर पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. स्वामी कुवलयानंद यांच्या पत्रांचे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या पत्रांमधून तरुण विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आणि प्रगतीचा मार्ग समजण्यास मदत होईल, असे प्रभू यांनी सांगितले.

कैवल्यधामचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यार्थी, कैवल्यधाम परिवारातील सदस्य तसेच आयएनएस शिवाजीचे अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button