Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ युवकांना एकत्र आणणारा दुवा ठरेल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील तसेच देशभरातील युवकांना क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’ या तीन दिवसीय भव्य युवा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. देशभरातील युवकांना एकत्र आणणारा हा दुवा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील युवा संमेलनात देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून युवकांचा सहभाग राहणार आहे. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून सुमारे 30 ते 35 प्रतिनिधी सहभागी होण्याचे नियोजन असून एकूण सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होतील. यामध्ये महाराष्ट्राचे 300 प्रतिनिधी, तर इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून 700 प्रतिनिधी सहभागी होतील. तीन दिवसांच्या या महोत्सवाला राज्यभरातील एक लाखांहून अधिक युवकांचा फूटफॉल असण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.

हेही वाचा –  ‘विद्यार्थी हितासाठी रूसा अंतर्गत प्रकल्पांना गती द्यावी’; मंत्री चंद्रकांत पाटील

विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026 हा भारताच्या युवा शक्तीला क्रीडा, नवोन्मेष आणि संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र आणणारा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम म्हणून प्रस्तावित आहे. यातून युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, नवोन्मेष व उद्योजकतेला चालना देणे, देशाची सांस्कृतिक विविधता साजरी करणे, आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या युवा संमेलनाची संकल्पना ‘वॉरिअर, फ्युचर आणि कल्चरल असा तीन अनुभव क्षेत्रांमध्ये करण्यात यावी. या तीनही क्षेत्रांमधून युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता, संस्कृती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. यापैकी वॉरिअर झोनमध्ये युवकांमध्ये सामर्थ्य, शिस्त आणि धैर्य विकसित करण्यावर भर देण्यात यावा. स्वसंरक्षण कार्यशाळा, क्रीडा विज्ञान, पोषण, क्रीडा मानसशास्त्र यासह विविध क्रीडा उपक्रम आयोजित करावा. आर्मी ऑब्स्टॅकल कोर्स, वॉल क्लायम्बिंग, रिअॅक्शन टाइम अरेना आणि फिटनेस असे अनुभवाधारित उपक्रमही यात असावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुणे हे तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने ‘फ्युचर झोन’मध्ये युवकांच्या तंत्रज्ञानविषयक क्षमतांना प्रोत्साहन देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना करत ‘कल्चरल झोन’मध्ये सर्जनशीलता, आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा यांचा संगम घडावे. महाराष्ट्रातील लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, चित्रकला, छायाचित्रण आदी कलाप्रकारांसाठी स्पर्धा आणि उपक्रम आयोजित करावे. त्याचबरोबर, योग, ध्यान, मानसिक आरोग्य, श्वसनाचे व्यायाम यांसारख्या उपक्रमांसोबतच स्थानिक हस्तकला, वारली व पैठणी कला, पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती आणि शाश्वत जीवनशैली यांचीही माहिती युवकांना करून देण्यात यावी, असे निर्देश दिले. या महोत्सवासाठी पूर्णपणे डिजिटल नोंदणी विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

ऑनलाइन नोंदणी, राज्यनिहाय नामनिर्देशन, कागदपत्र पडताळणी, क्युआर कोड आधारित डिजिटल ओळखपत्र, मोबाईल कार्यक्रम मार्गदर्शक आणि थेट सूचना अशी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यामुळे सहभागी युवकांची नोंदणी, प्रवेश आणि विविध उपक्रमांतील सहभाग याचे प्रभावी व्यवस्थापन करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘खेलो इंडिया’अंतर्गत केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्राने केंद्राच्या योजनांमध्ये प्रभावी सहभाग घेण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात खासगी क्षेत्राची गुंतवणूक आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीवर भर देण्याबरोबर क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील क्रीडा फाउंडेशनशी समन्वय साधण्याबाबत चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. महाराष्ट्राला आगामी दशकात क्रीडा क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी शासकीय प्रयत्नांसोबतच खासगी क्षेत्राची भागीदारी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button