ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

D Y Patil | प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते; मात्र आज सकाळी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड शोककळा पसरली असून राज्यभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापुरात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास कोल्हापूरचे महापौर, आमदार आणि पुढे तीन राज्यांचे राज्यपालपद भूषवण्यापर्यंत पोहोचला.
हेही वाचा
१९७२ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. राजकीय प्रवासात ते काही काळ काँग्रेसपासून दूर राहिले असले, तरी काँग्रेसचा एक अभ्यासू आणि मुत्सद्दी नेता म्हणून त्यांची ओळख कायम राहिली. २००९ ते २०१३ या काळात त्यांनी त्रिपुराचे राज्यपालपद भूषवले, तर २०१३ ते २०१४ या काळात त्यांनी बिहारच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळली. याशिवाय पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय योगदान
राजकारणासोबतच डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान ऐतिहासिक मानले जाते. त्यांनी उभारलेल्या अथांग शैक्षणिक संकुलांमुळे लाखो विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि उच्च शिक्षणाची कवाडे उघडी झाली. त्यांच्या या बहुमूल्य सामाजिक व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले होते.





