राजकारण तापलं! संजय दिना पाटलांविषयी पोलिस आयुक्तांना राऊतांचं पत्र, फडणवीसांनी घेतली कडक भूमिका

Devendra Fadnavis : ‘ऑपरेशन टायगर’नंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेला वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत.
ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याच्या आणि बॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्याचा दावा राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे. आंदोलन करणे आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, संबंधित प्रकाराबाबत कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रतिक्रिया देताना दिली. “कोणाचेही घर बॉम्बने उडवू देणार नाही, तसेच पोकळ धमक्यांना कोणीही घाबरू नये. धमक्या देणाऱ्यांवर पोलिस योग्य ती कारवाई करतील,” असा इशारा फडणवीसांनी दिला. या वक्तव्यातून फडणवीसांनी खासदार संजय दिना पाटील यांना अप्रत्यक्षपणे सुनावल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – महामार्गांवरील प्रवास आता अधिक सुरक्षित! ‘एमएसआरडीसी’ने राज्यभरात उचलले मोठे पाऊल
खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, संजय पाटील म्हणतात, “माझ्या नावाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन.” एवढेच नव्हे तर, “मी याआधी 5 लोकांना ठार केले आहे. माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन. घरात घुसून मारेन.”
संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावरुन या ५ लोकांच्या हत्येची कबुली आरोपीने स्वतःच दिल्याने त्यांच्याविरोधात तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तसेच संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना खासदार संजय दिना पाटील यांच्या घराची झाडाझडती घेण्याची विनंती केली आहे. यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.





