गॅस, पेट्रोल डिझेल नंतर आता ATMमध्ये रोख रकमेची टंचाई; देशभरातील ATM सेवा संकटात; उद्योग संघटनेचा इशारा

ATM Cash Shortage: देशभरातील एटीएम सेवांबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. अनेक एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवत असून, याचा परिणाम आगामी काळात ग्राहकांना भोगावा लागू शकतो. एटीएम उद्योगाशी संबंधित संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ATM इंडस्ट्री (CATMi) ने इंडियन बँक्स असोसिएशनला (IBA) पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधले आहे
अहवालानुसार, एटीएममध्ये भरण्यासाठी आवश्यक असलेली रोख रक्कम पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेक भागांमध्ये सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते.
उद्योग संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च आणि एप्रिल महिन्यांत देशातील एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी सुमारे 94 हजार कोटी रुपयांची गरज होती. मात्र मार्चमध्ये केवळ 61 हजार कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये फक्त 54 हजार कोटी रुपये उपलब्ध झाले. यामुळे एटीएममध्ये रोख भरण्याच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला.
हेही वाचा – ऋषभ पंतचं उपकर्णधारपद गेल्यानंतर आता कोच गंभीरने दिला इशारा, म्हणाला, “सामन्याच्या गरजेनुसार खेळ, कारण…”
CATMi ने आपल्या पत्रात म्हटले आहे की, अनेक राज्यांमधील बँक शाखा आणि एटीएम रोख रकमेच्या कमतरतेमुळे अडचणीत आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार होतात. त्यामुळे अशा भागांमध्ये एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन विभागालाही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
एटीएम उद्योग सध्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. एका बाजूला एटीएम व्यवहारांची संख्या कमी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला देखभाल खर्च वाढत आहे.
सध्या एका बँकेच्या ग्राहकाने दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर केल्यास 19 रुपयांचे इंटरचेंज शुल्क आकारले जाते. उद्योगाच्या मते, वाढत्या खर्चाच्या तुलनेत हे शुल्क अपुरे आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात देशात सुमारे 446.5 दशलक्ष एटीएम व्यवहार झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 498.3 दशलक्ष होता. म्हणजेच एटीएममधून पैसे काढण्याचे व्यवहार कमी झाले आहे.
व्यवहारांच्या मूल्यामध्येही घट दिसून आली आहे. मे महिन्यात एटीएम व्यवहारांची एकूण किंमत 2.5 ट्रिलियन रुपये होती, तर गेल्या वर्षी ती 2.64 ट्रिलियन रुपये होती.
विशेष म्हणजे, एटीएम व्यवहार कमी होत असतानाही अर्थव्यवस्थेत चलनाचा वापर आणि रोख रकमेचे सर्क्युलेशन वाढत आहे.





