“दोन्ही शिवसनेने एकत्र यावं”; अंबादास दानवेंच्या विधानावर एकनाथ शिंदेंचे सूचक उत्तर

मुंबई | विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांच्या एकत्रिकरणावर केलेले विधान सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. “भविष्यात दोन्ही शिवसेनेने एकत्र यायला हवे,” असे मत दानवे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, ठाण्यात प्रसारमाध्यमांनी यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिले आहे.
अंबादास दानवे यांनी शिवसेना एकत्रिकरणाबाबत मोठे विधान करताना म्हटले, “शिंदे यांचा गट संपवण्याचे काम भाजप करत आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची जी शिवसेना आहे, तिला कोणीही संपवू शकत नाही. दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यावे, असे मला बऱ्याच वेळा वाटते. परंतु, ते मला एकट्याला वाटून काहीही फायदा नाही.” त्यांच्या या विधानानंतर भविष्यात खरंच दोन्ही गट एकत्र येणे शक्य आहे का? यावर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
हेही वाचा
भारतीय लष्कराची दुसऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’साठी तयारी सुरू; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सूचक उत्तर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत ठाण्यात महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. या प्रसंगी पत्रकारांनी दानवेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलेले आहे. एकदा नव्हे तर दोनदा आम्ही हे सरकार स्थापन केले आहे.”
धनुष्यबाणाची घोडदौड अशीच चालू राहील!
उपमुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना एकत्रिकरणाचा मुद्दा बाजूला सारत म्हटले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनाला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना तसेच आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आमची ही घोडदौड अशीच पुढे चालू राहील.”





