“विजय मुख्यमंत्री झाल्याचं ऐकून प्रचंड धक्का बसला”; सुपरस्टार रजनीकांत यांची प्रतिक्रिया

Rajinikanth | तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय याने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी पहिली प्रतिक्रिया सुपरस्टार रजनीकांत यांनी दिली आहे. “विजय राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचे ऐकून मला प्रचंड धक्का बसला,” असे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले. चेन्नईतील पोएज गार्डन या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निवडणुकीच्या निकालानंतर रजनीकांत यांनी द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली होती, ज्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. याच टीकेला उत्तर देण्यासाठी आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रजनीकांत यांनी आज जाहीरपणे माध्यमांशी संवाद साधला.
नवे मुख्यमंत्री विजय आणि आपल्यातील संबंधांवर बोलताना रजनीकांत म्हणाले, “विजय मुख्यमंत्री झाल्याची बातमी जेव्हा माझ्या कानावर आली, तेव्हा मला खरोखरच मोठा धक्का बसला. मी आता राजकारणात सक्रिय नाही आणि राजकारणापासून दूर जाऊन मला आता अनेक दिवस झाले आहेत. माझ्या आणि विजयच्या वयात २८ वर्षांचे अंतर आहे. तमिळनाडूतील दोन बलाढ्य राजकीय पक्षांसमोर (द्रमुक आणि अण्णाद्रमुक) आव्हान उभे करत विजयने स्वतःच्या हिंमतीवर ही ओळख आणि यश मिळवले आहे, हे कौतुकास्पद आहे.”
हेही वाचा
रावेतमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; १५ लाखांहून अधिक ऐवज लंपास
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, “निवडणुकीच्या निकालांनंतर माझ्यावर सातत्याने विविध स्तरांतून टीका केली जात आहे. जर मी आज यावर काहीच बोललो नाही, तर लोकांकडून ती टीकाच ‘सत्य’ मानली जाईल. म्हणूनच मला आज माध्यमांसमोर येऊन वस्तुस्थिती मांडणे गरजेचे वाटले.”
पराभूत झालेले एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतल्याप्रकरणी होणाऱ्या टीकेलाही रजनीकांत यांनी सडेतोड उत्तर दिले. “आमची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे. कुळथूर मतदारसंघातून एम. के. स्टॅलिन यांचा पराभव झाला, याचे मला मनातून वाईट वाटले. कोणत्याही विषयावर विनाकारण किंवा खालच्या पातळीवर जाऊन बोलणारा रजनीकांत नक्कीच नाही,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. विजयच्या या ऐतिहासिक विजयाने आणि रजनीकांत यांच्या विधानाने तमिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे.





