फक्त ४ दिवस बाकी! लाखो लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले असून, यासाठी 30 एप्रिल ही शेवटची मुदत असणार आहे.
मात्र महिला व बाल विकास विभागाने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देऊनही राज्यातील सुमारे 26 लाख 34 हजार महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
आता 30 एप्रिल रोजी बँक बंद होण्याच्या वेळेपर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे. या ४ दिवसांत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे 26 लाख लाभार्थी योजनेतून कायमचे बाद होऊ शकतात.
योजनेच्या पडताळणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुमारे 12,415 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून त्यांनी घेतलेली रक्कम सरकार वसूल करणार आहे.
हेही वाचा – EPFO UPI PF Withdraw: मे पावणार! युपीआयमधून काढा पीएफचा पैसा, किती रक्कम काढता येणार
तसेच, राज्यभरात एकूण 12,757 पुरुषांनी ‘लाडकी बहीण’ बनून सुमारे 22.96 कोटी रुपयांचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार समोर आले. यानंतर आता अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्यांकडून जवळपास 165 कोटी रुपये वसूल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दुसरीकडे, बोगस महिला लाभार्थ्यांपैकी 6,457 जणींकडून सुमारे 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर, ज्या महिला केवळ तांत्रिक कारणास्तव किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अपात्र ठरतील, त्यांच्याकडून आतापर्यंत दिलेली रक्कम सरकार वसूल करणार नाही, असा दिलासादायक निर्णयही घेण्यात आला आहे





