अन्याय वाढतो तेव्हा जनताच दुर्गेचे रूप घेते, हे ममता विसरल्या!

नवी दिल्ली : जेव्हा अन्यायाची परिसीमा गाठली जाते तेव्हा जनता स्वतःच देवी दुर्गेचा अवतार घेते आणि परिवर्तन घडवते. दहशत संपली, विश्वास सुरू, असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची हाक दिली. राज्यातील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव आणि हुगली जिल्ह्यातील हरिपाल येथे मोदींच्या सभा झाल्या, तर कोलकात्यात त्यांनी भव्य रोड शोही केला.
मोदी म्हणाले, 15 वर्षांपूर्वी तृणमूल पक्ष ‘माँ, माटी, मानुष’चा नारा देऊन सत्तेत आला. मात्र आज त्या घोषणेमागील मूल्येच हरवली आहेत. माँ, माटी, मानुषचा सन्मान तृणमूलने राखला नाही. तृणमूलच्या महाजंगलात असलेल्या राज्यात छोट्या नेत्यांपासून गुंडांपर्यंत सर्वजण स्वतःलाच सरकार समजू लागले आहेत. पहिल्या टप्प्यातच मतदानानंतर तृणमूलचा अहंकार गळून गेला आहे. दुसर्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदानामुळे सत्ताधारी पक्ष चिंतेत आहेत.
हेही वाचा – सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच मिळणार पगारवाढ, सरकारनं घेतला मोठा निर्णय
ते म्हणाले, एकेकाळी कारखान्यांनी गजबजलेला हुगळी परिसर आज ओस पडलेला आहे. इंग्रज काळापासून सुरू असलेले बनगाव ते बराकपूर या पट्ट्यातील अनेक कारखाने बंद पडले आहेत. आता येथे ‘कट-मनी’ आणि ‘कमिशन’चीच व्यवस्था उरली आहे. तृणमूल सरकार अत्याचार करणार्यांच्या पाठीशी उभे आहे. 4 मे नंतर भाजप सत्तेत आल्यावर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल. येथील युवकांमध्ये प्रचंड सर्जनशीलता आहे. योग्य संधी मिळाल्यास ते देशाला पुढे नेऊ शकतात. सोशल मीडियावर व्हायरल होणार्या बंगाली कंटेंटचाही त्यांनी उल्लेख केला.
मोदींनी भाषणांदरम्यान, स्थानिक नागरिक सध्या ‘पलटानो दरकार’ म्हणजे बदल गरजेचा आहे – हा एकच नारा देत असल्याचा दावा केला. दरम्यान, मोदींनी ठाकूरनगर येथील मतुआ ठाकूर मंदिरात दर्शन घेतले आणि स्थानिक समुदायाशी संवाद साधला. कोलकात्यात रोडशो पूर्वी मोदींनी 1703 मध्ये स्थापन केलेल्या माँ सिद्धेश्वरी मंदिरातील थंथानिया कालीबाड़ी येथे काली मातेचे दर्शन घेतले. येथे मांसाहारी नैवेद्याची प्रथा रामकृष्ण परमहंस यांनी सुरू केली होती.





