‘भोंदू’ बाबावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घाला; रोहित पवार आक्रमक

मुंबई | बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी आपला राजपाट समर्थांकडे दिला,” असे विधान शास्त्री यांनी केल्याने शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला असून, या ‘भोंदू’ बाबावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालण्याची आक्रमक मागणी केली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “हे वक्तव्य केवळ चुकीचे नसून अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि आपल्या समृद्ध संत परंपरेबद्दल गरळ ओकली होती. वारंवार अशी विधाने करून छत्रपतींचा इतिहास आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावण्याचा, तसेच महापुरुषांचे महत्त्व कमी करण्याचा हा कोणताही ‘एककलमी कार्यक्रम’ तर नाही ना? अशी शंका येते”.
हेही वाचा
रशिया-युक्रेन युद्धात १० भारतीयांचा मृत्यू; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य झाले, तिथे राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते, यावरून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. “शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्याचे राज्यकर्ते त्याच मंचावर उपस्थित होते, याचे जास्त दुःख वाटते,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रोहित पवार यांनी सरकारला इशारा देताना स्पष्ट केले की, छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींवर महाराष्ट्रात तात्काळ बंदी घालण्यात यावी. हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा याचे परिणाम सरकारला आणि संबंधित व्यक्तीला महागात पडतील. सरकार यावर कारवाई करेल, असे वाटत नाही. त्यामुळे आता ‘सहन करून दुर्लक्ष करायचे की धडा शिकवायचा’, हे शिवप्रेमी जनता आणि महामानवांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवावे.





