राज्यात पाऊस आणि उन्हाचा दुहेरी तडाखा; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather | राज्यात सध्या अस्थिर हवामानाची स्थिती निर्माण झाली असून एकीकडे वादळी पाऊस आणि गारपीट, तर दुसरीकडे तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून गुरुवारी अनेक भागांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही भागांत वादळी पाऊस आणि गारपिटीची नोंद होत आहे. मात्र विदर्भात हवामान कोरडे असून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल न झाल्याने अनेक भागांत उन्हाची तीव्रता कायम असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा
‘भारत दहशतवादापुढे झुकणार नाही’; पंतप्रधान मोदी
या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज असून दुपारनंतर किंवा संध्याकाळी तुरळक सरी पडू शकतात.
‘एल निनो’चा प्रभाव; पावसावर परिणाम होण्याची शक्यता
यंदा प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभाग आणि खासगी संस्थांनी व्यक्त केला आहे. ‘एल निनो’ विकसित झाल्यास देशासह राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, २५ ते २७ एप्रिल दरम्यान नव्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव उत्तर भारतावर राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली असून २५ एप्रिलपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.





