महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेत आर वैशालीचा ऐतिहासिक विजय; १५ वर्षांनंतर भारतीय महिला जागतिक किताबाच्या लढतीत

R Vaishali | भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत देशाचा तिरंगा उंचावत आहेत. पुरुषांबरोबरच महिला बुद्धिबळपटूही जागतिक पातळीवर ठसा उमटवत आहेत. अशात भारतीय ग्रँडमास्टर आर वैशाली हिने सध्या सुरू असलेल्या महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेचा शेवट अत्यंत नाट्यमय ठरला. निर्णायक क्षणांमध्ये वैशालीने संयम, अनुभव आणि अचूक डावपेचांच्या जोरावर अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. या यशामुळे ती जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्र ठरणारी गेल्या १५ वर्षांतील पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय महिला बुद्धिबळासाठी नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : सामना सुरु असताना मैदान सोडणाऱ्या रोहित शर्मा बाबत वाईट बातमी, मुंबई इंडियन्सला अजून एक धक्का
या निकालामुळे बुद्धिबळाच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच एखादी भारतीय महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या किताबासाठी लढणार आहे. वैशाली ही या मानाच्या स्पर्धेत पोहोचणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी भारताच्या कोनेरू हम्पी हिने २०११ मध्ये अल्बेनियातील तिराना येथे चीनच्या हौ यिफान विरुद्ध महिलांच्या जागतिक किताबासाठी आव्हान दिले होते. आता हम्पीनंतर आर वैशालीने १५ वर्षांनंतर ही कामगिरी करत भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात नवे पान जोडले आहे.





