महायुती जास्त काळ टिकणार नाही; सातारा घटनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. विधान परिषदेत सोमवारी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा उपसभापती निलम गोऱ्हे यांचा निर्णय सभापती प्रा. राम शिंदे यांनी राखून ठेवला. या निर्णयानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत, “सरकारमधील मित्रपक्ष फार काळ एकत्र राहणार नाहीत,” असा दावा केला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. साताऱ्यात जे घडलं, त्या महाराष्ट्रातील सर्व झुंडगिरी, गुंडगिरीचा केंद्रबिंदु विधिमंडळाच्या इमारतीत आहे. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा लोकशाहीचा खून झाला त्या सगळ्याचा केंद्रबिंदु विधिमंडळाच्याच इमारतीत आहे. मुळात जे लोकशाहीचा खून झाला म्हणत आहेत त्यांचेच हात लोकशाहीच्या रक्ताने रंगलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या काल पायऱ्यांवर काही मंत्री आमदार होते आणि लोकशाहीचा खून झाला म्हणत होते. त्यामधील काही मंत्री जेव्हा शिवसेना सोडून गेले, तेव्हा हे वाघाचं कातडं पाघरलेले वाघ गर्जना करत होते की स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही कसा पक्ष सोडला, आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कातडं पाघरलेल्या वाघांची अक्षरश: माजरं आणि बोके झाले होते, असं राऊत म्हणाले.
हेही वाचा : थेरगावात लाडशाखीय वाणी समाजाचे उपवर परिचय संमेलन उत्साहात
सरकारमधील मंत्र्यांची अशी अवस्था का? तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांने सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलंय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक, कुठे गेला तुमच्यातील बाळासाहेबांनी घडवलेला मर्द मावळा? तुम्ही मार खाल्लात… तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव-म्याव करताय. शेवटी जे कर्म तुम्ही केलंत त्या कर्माचं हे फळ आहे, असं संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडच्या पालकमंत्र्याला चोप दिला… सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाची भूमी आहे. तिथे ग. दि. माडगूळकरांसारखे कवी जन्माला आले. एक सिनेमा आला होता, अशी साताऱ्याची तऱ्हा, आता साताऱ्यात जे घडलं आहे ती साताऱ्याची तऱ्हा संपूर्ण महाराष्ट्राची तऱ्हा झाल्याचे दिसत आहे. सरकारमधील मित्रपक्ष फार काळ एकत्र राहाणार नाहीत. नाहीतर त्यांना रोज रस्त्यावर पोलिसांचा मार खावा लागेल हे दिसतंय, ही सुरूवात आहे. सत्तेच्या बळावर ते शिवसेना फोडू शकले तर जे फुटलेत त्यांनाही फोडू शकतात आणि रस्त्यावर फोडू शकतात हे भाजपाच्या कृतीमधून स्पष्ट दिसलं आहे, असेही संजय राऊत म्हणाले.





