भोंदू बाबासह भोंदू भक्तांवरही कारवाई करा; उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबई | नाशिक जिल्ह्यातील कॅप्टन अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. याच अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. “भोंदू बाबासह भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र आणखी किती खालच्या स्तरावर नेणार आहात? महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा आहे. त्या कायद्याचं पालन करणारेच जर अशा प्रकारे भोंदू बाबाच्या नादी लागत असतील तर भोंदू बाबाच्या भक्तांवर देखील कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणात भोंदू बाबाचे भक्त दिसत आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वांची चौकशी करा.
हेही वाचा : चाकणकरांसह अनेक मंत्री खरातच्या संपर्कात; संजय राऊत यांचा आरोप
अशा प्रकारे जर गावोगावी भोंदू बाबा असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्या नेत्यावरही कारवाई झाली पाहिजे. राज्यातील राजकारण आपण आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहात? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हा मुद्दा काही सत्ताधारी आमदारांच्या संबंधित आहे. आमच्या काही आमदारांनी सत्ताधाऱ्यांचे अनेक प्रकरणं बाहेर काढले आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरणे देखील समोर आणले आहेत. मी आता मागच्या एक पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी अजून एक पांघरुण खातं निर्माण केले पाहिजे. सगळ्यांच्या पापांवर पांघरुण घालणं, हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवलं पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.





