सामाजिक न्याय विभागात कोट्यवधींचा घोटाळ्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांची मालिका थांबलेली नसून सिडको, छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल प्रकरण तसेच सामाजिक न्याय विभागातील निविदा प्रक्रियेनंतर आता आणखी एका कथित घोटाळ्याचा मुद्दा समोर आला आहे. निधी वितरण, निविदा प्रक्रिया आणि मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांकडून अनियमितता व गैरव्यवहार होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रात मंत्री कार्यालयातील खासगी सचिव भरत कदम यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल 2026 चा थरार
सामाजिक न्याय विभागात विविध योजनांतील निधी वितरण प्रक्रियेत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन निविदा प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय काही अधिकारी मंत्री कार्यालयाचा वापर करून कामे देताना आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींकडून टक्केवारीची मागणी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व बाबी गंभीर असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.





