भाजपाची वाढती क्रेझ : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत दिघीतील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
मिशन- PCMC : दिघीत राजकीय समीकरणे बदलली; राष्ट्रवादीला मोठा धक्का

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा पवार आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. दिघी येथील राष्ट्रवादीच्या माजी व विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आज आमदार महेशदादा लांडगे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री दत्तात्रय आबा गायकवाड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
शहरात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस गटाला गळती लागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी तब्बल २२ माजी नगरसेवकांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर दिघी परिसरातून दत्तात्रय आबा गायकवाड यांचे चिरंजीव श्री उदय गायकवाड यांच्या सहकार्याने आणि कार्तिक लांडगे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते भाजपात दाखल झाले.
याशिवाय दत्तात्रय आबा गायकवाड यांचे शिष्य मानले जाणारे उबाठा गटाचे विभाग प्रमुख संतोष वाळके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाची वाट धरल्याने दिघीतील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. यामुळे येथील आगामी निवडणूक एकतर्फी होण्याचे संकेत याआधीच मिळाले होते.

हेही वाचा : मिशन- PCMC : ‘दादां’चा शब्द अन् विकासाची साथ!
या राजकीय घडामोडींना आणखी वेग देत आज राष्ट्रवादी काँग्रेस गटातील मातब्बर पदाधिकारी श्री प्रशांत कलाल आणि श्री सचिन दुबळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रभाग क्रमांक ०४ दिघी येथील राष्ट्रवादीचे उमेदवार श्री चंद्रकांत वाळके यांच्याविषयी असलेल्या नाराजीमुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘तगडे उमेदवार’ म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांत वाळके यांच्यापुढील आव्हाने वाढली असून यंदाही त्यांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पॅनल प्रमुख म्हणून भूमिका बजावणाऱ्या वाळके यांचा पराभव अटळ दिसू लागल्याने त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य उमेदवारही अस्वस्थ स्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा वाढता प्रभाव, विकासाची स्पष्ट दूरदृष्टी, आमदार महेशदादा लांडगे यांची प्रभावी संघटन शैली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार दौरा तसेच दिघीतील युवा नेतृत्व म्हणून उदयास येत असलेले श्री उदय गायकवाड यांची पारदर्शक कार्यपद्धती यामुळे प्रभाग क्रमांक ०४ मधील भाजपचे चारही उमेदवार विजयी होतील आणि भाजपाची परंपरा कायम राहील, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
“दिघी परिसराचा सर्वांगीण विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. प्रत्येक कार्यकर्ता, युवक आणि नागरिकाला सोबत घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारण आम्ही करणार असून दिघीला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे.”
– उदय गायकवाड, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 4.





