‘लोकं नाही तर गडचिरोलीचा विकास धावत आहे’’; सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली : आज केवळ नागरिक धावत नाहीत, तर गडचिरोलीचा विकास धावत आहे. गडचिरोलीकरांची ही जिद्द आणि सकारात्मक ऊर्जा जिल्ह्याचा कायापालट घडविल्याशिवाय राहणार नाही,” असे प्रतिपादन वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
यावेळी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन तसेच अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामॅरेथॉनला शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगून, राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी मॅरेथॉनच्या सुंदर व यशस्वी आयोजनाची स्तुती केली. गडचिरोली जिल्हा आता इतर जिल्ह्यांना प्रेरणा देणारे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या महामॅरेथॉनमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे १४ हजार नागरिकांनी सहभाग घेतला. २१, १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा विविध अंतरांच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला तसेच पोलीस व सुरक्षा दलातील जवानांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महामॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, सहपालकमंत्री व उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः मॅरेथॉनमध्ये धावून सहभाग नोंदविला.
२१ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात साक्षी पोलादवार तर पुरुषांच्या गटात रोशन बोदलवार याने प्रथम क्रमांक मिळविला. १० किलोमीटर मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात मुन्नी मडावी आणि पुरुषांच्या गटात रोहन बुरसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.





