एक दिवस मुख्यमंत्री झाले तर काय करणार? अमृता फडणवीस यांचं उत्तर चर्चेत

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि समाजसेविका अमृता फडणवीस या त्यांच्या विविध पोस्ट्स आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीतील उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमृता फडणवीस यांनी Curly Tales या प्लॅटफॉर्मला मुलाखत दिली. कामिया जानी हिने घेतलेली ही मुलाखत वर्षा निवासस्थानावर पार पडली.
या मुलाखतीदरम्यान त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा विचार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मी राजकारणात येणार नाही असं म्हटलं आहे. मी बँकिंग क्षेत्रात आहे, समाज सेवेचं काम करते. त्याचप्रमाणे गाणं गायलाही मला खूप आवडतं. पण मला राजकारणात येण्यामध्ये कुठलाही रस नाही. मी राजकारणात यायला इच्छुक नाही असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.
हेही वाचा : महाविकास आघाडीत ‘‘बिघाडी’’? निवडणुकीपूर्वी विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा
एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, देवेंद्र फडणवीस यांनी इतकं काम केलं आहे की एक दिवसासाठीही मला मुख्यमंत्रिपद मिळेल की नाही माहीत नाही. मुंबईतल्या पायाभूत सुविधा, महाराष्ट्रासाठी आणलेले विविध प्रकल्प, अधिकारी वर्गामधे होणारा भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आहे. तसंच अनेक प्रकल्प त्यांनी करायचं ठरवले आहेत मग तो नदीजोड प्रकल्प असेल किंवा इतर. पण तरीही एक दिवसासाठी मी जर मुख्यमंत्री झाले तर मी देवेंद्र फडणवीस आणि दिविजासह एखाद्या छान ठिकाणी जाऊन तो संपूर्ण दिवस घालवेन. असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं आहे.
तुम्हाला सर्वात जास्त राग कसला येतो? असा प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस म्हणाल्या, पाठीत खंजीर खुपसणाऱ्या म्हणजेच आपला विश्वासघात करणाऱ्या लोकांचा मला सर्वाधिक राग येतो. मला असे लोक अजिबात आवडत नाहीत. तुम्ही समोर या आणि सच्चेपणाने वागा. विश्वासघात करणार असाल तर माझ्यापासून लांबच राहा. असंच मी सांगेन, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.




