मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय: महाराष्ट्रासह ‘या’ 4 राज्यांमध्ये मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (७ ऑक्टोबर) झालेल्या आर्थिक विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत तब्बल ₹24,634 कोटी खर्चाच्या चार मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या चार राज्यांतील १८ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या रेल्वे नेटवर्कमध्ये जवळपास ८९४ किलोमीटरची वाढ होणार आहे.
अधिकृत माहितीनुसार, या प्रकल्पांमुळे सुमारे ८५.८४ लाख लोकसंख्या असलेल्या ३,६३३ गावांमध्ये रेल्वे संपर्क वाढणार आहे. वाढीव मार्ग क्षमतेमुळे रेल्वे वाहतुकीचा वेग आणि विश्वासार्हता दोन्ही सुधारतील.
मंजूर झालेले प्रमुख प्रकल्प:
वर्धा–भुसावळ (महाराष्ट्र) : ३१४ किमी अंतरावरील तिसरी व चौथी लाईन
गोंदिया–डोंगरगढ (महाराष्ट्र–छत्तीसगड) : ८४ किमीची चौथी लाईन
वडोदरा–रतलाम (गुजरात–मध्य प्रदेश) : २५९ किमीची तिसरी व चौथी लाईन
इटारसी–भोपाल–बीना (मध्य प्रदेश) : ८४ किमीची चौथी लाईन
या सर्व प्रकल्पांमुळे मालगाड्या आणि प्रवासी गाड्यांच्या हालचाली अधिक सुरळीत होतील तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये मालवाहतुकीस चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे.
हेही वाचा – चिखली-मोशी शिवरस्ता कोंडीवर ‘‘रामबाण उपाय’’
दिवाळी-छठ पर्वानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय: १२,००० विशेष गाड्या
दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह ‘ललन सिंह’, खासदार डॉ. संजय जायसवाल आणि संजय कुमार झा यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर १३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान प्रवास करणाऱ्या आणि १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान परतणाऱ्या प्रवाशांना रिटर्न तिकिटावर २० टक्के सूट देण्यात येणार आहे.
बिहारसाठी रेल्वेच्या नव्या योजना:
राज्यातून लवकरच चार ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्या सुरू होणार — गया–दिल्ली, सहरसा–अमृतसर, छपरा–दिल्ली आणि मुजफ्फरपूर–हैदराबाद दरम्यान.
पूर्णिया–पटना मार्गावर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू होणार.
भगवान बुद्धांच्या धार्मिक स्थळांना जोडणारा विशेष बौद्ध सर्किट रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार — वैशाली, हाजीपूर, सोनपूर, पटना, राजगीर, गया व कोडरमा यांना जोडणार.
बक्सर–लखीसराय रेल्वेखंडाचे फोर-लेन रूपांतर, जेणेकरून अधिक गाड्या चालवता येतील.
पटना परिसरात रिंग रेल्वे प्रणाली, तसेच सुलतानगंज–देवघर आणि पटना–अयोध्या दरम्यान नवीन गाड्यांची सेवा सुरू होणार आहे.
या निर्णयांमुळे देशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि प्रवासी सुविधा दोन्ही नव्या पातळीवर नेण्यात येतील, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.





