हवामान विभागाचा मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसाठी ‘रेड’ अलर्ट जारी
'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : पावसाळा संपत आला तरी पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये तुफान पाऊस सुरु आहे. मागच्या चार दिवसांमध्ये तर अक्षरशः जमिनी वाहून गेल्या आहेत आणि घरांमध्ये पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकरी भिषण संकटात सापडला आहे.
मुंबई आणि पावसाचं नातं तर फारच भीतीदायक आहे. थोड्याही पावसाने मुंबईची तुंबई होते. शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था, लोकल ट्रेन व्यवस्थेवर पावसाचा विपरित परिणाम होतो. मुंबईकरांचे पावसामुळे मोठे हाल होतात. त्यामुळे आता मुंबईकरांनी सावधान होण्याची वेळ आलेली आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
हवामान विभागाने उद्या दि. २९ सप्टेंबरसाठी रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसाठी ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट सोमवारी सकाळपर्यंत असेल. त्यामुळे मुंबईकरांनी कामाशिवाय बाहेर न पडलेलं बरं. त्यात सुदैवाची बाब म्हणजे उद्या रविवार असल्याने वाहतूक व्यवस्थेवरचा ताण तसा कमीच असेल.
हवामान विभागाने मराठवाड्यातही पावसाचा अलर्ट दिलेला आहे. दोन दिवस अलर्ट असल्याने शेतकरी, कामगार आणि पूररेषेच्या जवळ असलेल्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळ पडलेला असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग प्रभावित झाला आहे.





