मुंबईसह राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Weather | मागील दोन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून, आजही (मंगळवार) राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
रविवार आणि सोमवारी राज्यभरात पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी तारांबळ उडाली. काही भागांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने पावसाचा जोर वाढला आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: मुंबई, ठाणे आणि पालघर भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने रहिवाशांनी काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून बचावासाठी स्थानिक प्रशासनही सज्ज आहे.
पावसाचा अंदाज असलेले जिल्हे
मेघगर्जनेसह पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा.




