पुण्यात आजपासून एक वेळ पाणी
पुणे – शहर आणि उपननगरांतील नागरिकांना सलग पाच तास पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या योजनेची सोमवारपासून (ता. २९) अंमलबजावणी होणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार रोज पहाटे अडीच ते रात्री बारापर्यंत टप्प्याटप्याने पाणीपुरवठा होईल. सर्व भागांना समान पाणी पुरविण्यात येईल. मात्र, तांत्रिक कारणांमुळे पहिल्या दोन दिवसांत अडचणी येऊ शकतात, अशी शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होण्याची भीती आहे.
शहराच्या पाणीसाठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतला आहे. त्यानुसार शहराला सध्या रोज १३५० पैकी ११५० ‘एमएलडी’ पाणी मिळणार आहे. त्यातच गेल्या २० दिवसांपासून बहुतांशी भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या भागात पाच तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा होणार आहे, तेथे कपात करून सरसकट पाच तास पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे.
सर्व भागांना समान पाणीपुरवठा होणार आहे. जलकेंद्रानुसार केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होईल. त्यात अडचणी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचना पाणीपुरवठा खात्याला केली आहे.
-मुक्ता टिळक, महापौर