Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला ७६ लाख अतिरिक्त मतांचा हिशेब; म्हणाले, “६ वाजेनंतर…”

Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून विरोधी पक्षांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. ईव्हीएमसंदर्भात विरोधकांनी सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्षांवर केलेल्या आरोपांमध्ये सर्वात महत्त्वाचा आरोप होता तो म्हणजे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर आलेलं अतिरिक्त ७६ लाखांचं मतदान कसं झालं? खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांनीही या अतिरिक्त ७६ लाख मतांबाबत संशय व्यक्त केला होता. या सर्व मुद्द्यांवर आज महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“विधानसभा निवडणुकीत मतदार होते ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९. यापैकी मतदान झालं ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९६. म्हणजे ६६.५ टक्के. सकाळी ७ ते ९ यादरम्यान ६.६१ टक्के म्हणजे ६४ लाख १३ हजार ३६०. सकाळी ९ ते ११ मध्ये ११.५३ टक्के. म्हणजे १ कोटी ११ लाख ८६ हजार ९९६ मतं. सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान १४ टक्के मतदान झालं. म्हणजे १ कोटी ३६ लाख २२ हजार ३२७. दुपारी १ ते ३ मध्ये १३.३५ टक्के. म्हणजे १ कोटी २९ लाख ५२ हजार ८५३. दुपारी ३ ते ५ दरम्यान १२.६९ टक्के मतदान झालं. म्हणजे १ कोटी २३ लाख १२ हजार ४८८. संध्याकाळी ५ ते ६ या वेळात ६ पूर्वी जेवढे लोक रांगेत उभे राहतात, त्या सगळ्यांना आपण मतदान करू देतो. अनेक ठिकाणी रात्री ८ पर्यंत मतदान चालतं. या वेळेत ७५ लाख ९७ हजार ०६७ लोकांनी मतदान केलं. महाराष्ट्रात एक लाख मतदान केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ७५ लोकांनी मतदान केलं आहे. ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झालं. अंतिम आकडेवारी आली ६६ टक्के. म्हणजे ७.८३ टक्क्यांनी मतदान वाढलं”, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर आकडेवारी मांडली.

हेही वाचा     –        ‘राहुल गांधींमुळे मला दुखापत’, भाजपा खासदाराचा आरोप; राहुल गांधी म्हणाले..

या आकडेवारीचं विरोधकांच्या आरोपांनुसार देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरणही दिलं. “सरासरी प्रत्येक तासाला ५.८३ टक्के मतदान झालं आहे. सरासरी ताशी मतदान जवळपास ६० लाखांचं आहे. प्रतिमिनिट मतदान जवळपास ९७ हजार १०३ इतकं आहे. याचा अर्थ एकूण विचार करता ६ वाजेनंतरच्या मतदानाचा हिशेब लावला तर ते फक्त १७ लाख इतकं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणूक निकालांनंतर मारकडवाडी ग्रामस्थांनी केलेला पेपरवरील मतदानाचा प्रयत्न प्रशासनाने बंद पाडला. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. “मला बाकी कुणाचं आश्चर्य वाटलं नाही. मला फक्त शरद पवारांचं आश्चर्य वाटलं. कारण शरद पवार देशातले अत्यंत तटस्थ नेते आहेत. याआधी काँग्रेसनं अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा मांडला. पण शरद पवारांनी तो कधीच मांडला नाही. यावेळी मात्र शरद पवारांनी पहिल्यांदाच नवीनच लॉजिक आणलं. ते म्हणाले की ईव्हीएमचं सेटिंग असं झालंय की छोटी राज्य विरोधक जिंकतात आणि मोठी राज्य आम्ही जिंकतो. कर्नाटक, पश्चिम बंगाल छोटं राज्य आहे का? आता काँग्रेसवालेही एकटे पडले आहेत. कारण परवा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या. ममता दीदींनीही हाच सल्ला दिला”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसलाही टोला लगावला.

“राम सातपुतेंसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता पाच वर्षं राबतो आणि एकट्या मारकडवाडीत २२ कोटींची कामं करतो. पण त्याला जास्त मतं मिळाल्यावर तुम्ही लोकांना जाऊन धमकावता? तिथे लोकांना धमकावण्यात आलं की बॅलेटवर मतदान घ्यायचं आणि मत मिळायला हवं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला. ही कोणती लोकशाही आहे? जिथे मतं मिळत नाहीत, तिथे जाऊन दादागिरी करायची? लोकशाहीत दादागिरी खपवून घेतली जाणार नाही”, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना इशारा दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button