‘उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत’; काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे विधान

मुंबई | काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी निवडणूकीसाठी जोरदार तयारीला लागली आहे. भाजपनं रविवारी आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून मोठा वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. यातच काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, की मी मुख्यमंत्री व्हावे, असे कुणीतरी म्हणाले, पण माझ्या मनात एक खंत आहे ही उद्घव ठाकरे यांनी सरकारमधअये 5 वर्षे पूर्ण करायचे होते. त्यामुळे आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोट धरून राजकारणात आणले, पद, मानसन्मान आणि आर्थिक बळ दिले. त्यांना उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद डोळ्यात खुपले. उद्धव ठाकरे यांची रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असताना बाळासाहेबांना बाप म्हणणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच विश्वासघात केला. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवू नका.
हेही वाचा – पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी सज्ज
ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही. महाविकास आघाडीत जे काही किंतू, परंतु असतील, ते एकत्र बसून तेथेच मिटवून घ्या. बुथ सांभाळा. मतदान केंद्र आणि मतदान यंत्रांवर लक्ष ठेवा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत २ लाख मतांच्या फरकाने आमच्या उमेदवाराचा विजय होईल, याची निश्चिती वाटत होती, पण गद्दारी कुणी केली, पैसा किती खर्च केला, हे सांगण्याची गरज नाही. म्हणूनच गावागावातून मतदान बाहेर काढावे लागणार आहे. येत्या २४ ऑक्टोबरला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. संपूर्ण तिवसा मतदारसंघ माझे कुटुंब आहे. युवकांनी या निवडणुकीत गाफील राहता कामा नये, असंही यशोमती ठाकूर म्हाणाल्या.





