‘केंद्रातील मोदी सरकार निगरगट्ट’; नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचं टीकास्र
![Praniti Shinde said that the Modi government at the center is incompetent](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Praniti-Shinde-and-Narendra-Modi-780x470.jpg)
मुंबई | नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. सरकारने नीटच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. सोमवारी याच मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ झाल्याचंदेखील बघायला मिळालं. दरम्यान, आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही नीटच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, काल लोकसभेत नीटवर जी काही थोडीफार चर्चा झाली, त्यादरम्यान, शिक्षणमंत्री नीटचा पेपर लीक झाला हे मानायला तयारच नव्हते. आम्ही नीटच्या मुद्द्यावरून सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सरकार यावर चर्चा करायलादेखील तयार नाही, नियम १९३ अंतर्गत जी चर्चा झाली, ती सुद्धा ऑलिम्पिकवर घेण्यात आली. या नियमानुसार प्रत्येक सत्रात एकदाच चर्चा होऊ शकते. त्यामुळे नियम १९३ अंतर्गत नीटवर चर्चा व्हावी, असा आमचा प्रयत्न होता. पण त्यांनी विरोधकांना काहीही न सांगता ऑलिम्पिकवर चर्चा ठेवली. आम्ही नीटच्या मुद्द्यावरून शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला, पण ते नीटचा पेपर लीक झाला, हे मान्य करायलाच तयार नाहीत, यावरून हे सरकार किती निगरगट्ट हे लक्षात येईल.
हेही वाचा – ‘मी आता येवल्यात जाऊन..’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा
राहुल गांधी काय म्हणाले?
देशात परीक्षांबाबत जे घडत आहे, त्यामुळे लाखो विद्यार्थी चिंतित आहेत. या विद्यार्थ्यांचा भारतीय परीक्षा प्रणालीवरचा विश्वास उडाला आहे. यादेशात जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पास होऊ शकता, तुम्ही पैशाने कागद खरेदी करू शकता हे लोकांना माहीत आहे आणि विरोधकांचीही तीच भावना आहे. देशातील परीक्षा पद्धतीत खूप गंभीर समस्या आहेत, हे स्पष्ट झाले आहे. केवळ नीट परीक्षाच नाही, तर देशातील सर्वच प्रमुख परीक्षांमध्ये घोटाळे बघायला मिळत आहेत. सरकारला याची उत्तरं द्यावी लागतील, असं राहुल गांधी म्हणाले.
मला कोणाकडूनही माझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नको आहे. माझ्या जनतेने मला निवडून पाठवले आहे. माझ्या पंतप्रधानांनी मला जबाबदारी दिली आहे. देशाची परीक्षा प्रणाली रद्दबातल आहे, असे म्हणणे. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही, असं शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.