एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांना एकत्र आणणार
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे ध्येय
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी माध्यमांना दिली आहे. नाथाभाऊ मोठे नेते आहेत, त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतीलच आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
माझी इच्छा आहे की, भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे लोक जोडतील तेवढी आमच्या पक्षाची ताकद वाढेल. नाथाभाऊ हे भाजपमधील खूप जुने नेते आहेत, त्यामुळे गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे, असा विश्वास रक्षा खडसे यांनी केला.
नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल, गेल्या चार-पाच वर्षापासून मी या दोघांचा संघर्ष बघत आलेली आहे परंतु माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे की, या दोघे ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. मागील काळामध्ये जेव्हा या दोन्ही नेते एकत्र होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासाठी खूप चांगली कामे झालीत. मात्र मागील काळात काही नाथाभाऊंच्या आणि काही गिरीश भाऊंच्या ज्या चुका झालेल्या आहेत, तसेच त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत असेही त्यांनी यावेळी मान्य केले.
आता चांगली संधी आहे हे आरोप प्रत्यारोप थांबून दोघांनी एकत्र आल पाहिजे, कारण गिरीश भाऊ स्वतः मंत्री आहेत आणि जिल्ह्यात आता चार मंत्री झाले आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच आपला जिल्ह्याचा खूप चांगला विकास होईल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
एकनाथ खडसे यांनी मंत्रीपद सोडल्यापासून गिरीश महाजन आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. त्यानंतर एकनाथ खडसे यांचे भाजपमधील महत्त्व कमी होऊ लागले. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचे पुन्हा संकेत दिलेत. पण अद्यापही त्यांची घर वापसी झालेली नाही आहे.