‘..तर विधानसभेला सगळ्यांना पाडणार’; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
Manoj Jarange Patil | सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेत विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला आहे. मराठा आरक्षण आणि मराठा जाती विरोधात बोलू नका, अन्यथा विजय वडेट्टीवारला पाडेन आणि काँग्रेसच्या सर्व सीट पाडेन, असं ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या समाजाची लेकरं मोठी झाली पाहिजेत यासाठीच मी जिवाची बाजी लावली आहे. आमचं काही कुणी शत्रू नाही. सगे-सोयऱ्यांच्या अमलबजावणीचा विचार करत असतील तर चांगली गोष्ट आहे. एवढा विरोध मी पत्करला आहे तो मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांसाठीच केला आहे. सगे-सोयऱ्यांची अमलबजावणी आमच्या अटींप्रमाणे केली तर आम्ही काय म्हणणार? शिवाय ते टिकवण्याची जबाबदारीही सरकारची आहे.
हेही वाचा – राज्यभर मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
आम्हाला सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. ती झाली नाही तर विधानसभेला आम्ही फजिती करु. मराठ्यांची मतं घ्यायची, त्यानंतर विरोधात बोलायचं असं चालणार नाही. भोळे मराठे मतं देतात, त्यांचा फायदा घेतला जातो. निवडून आले की मस्तीत यायचं हे कसं चालेल? तुम्ही आत्ता निवडून आला असाल तर विधानसभेला सगळ्यांना पाडणार. निवडून आल्यावर मराठ्यांना आरक्षण दिल्याची भाषा करणार असाल तर विधानसभेला बघून घेऊ. सरकारने अधिसूचना काढली आहे. अंमलबजावणी झाली नाही तर त्यांना कोट्यवधी मराठ्यांची नाराजी परवडणार नाही. मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मराठ्यांचा रोष अंगावर घेतला तर विधानसभेला सगळं गणित अवघड होईल, असं जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची मागणी असलेल्या सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी एवढीच आमची मागणी आहे. या मागणीसाठीच मी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहे. तर सरकारला हा कायदा करण्यासाठी काही पुराव्याची गरज लागत असेर तर तब्बल ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.