‘निवडणूक रोखेंच्या माध्यमातून भाजपाने..’; संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘डीडी न्यूज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. मात्र त्यांच्या या मुलाखतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कडाडून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व भ्रष्टाचारींना त्यांच्या पक्षात सामावून घेतलं आहे. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे खोटं बोलतात. मी पंतप्रधानांना बोलत नसून भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलत आहे. भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी केलेल्या घोषणा भंपक आणि खोट्या आहेत. निवडणूक रोखेंच्या माध्यमातून भाजपाने केलेला घोटाळा हा भयंकर आहे, हे जर अन्य देशात घडलं असतं तर त्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्याविरोधात खटला चालवला असता. निवडणूक रोखे हा किती मोठा घोटाळा आहे. दहशत आणि धमकीच्या माध्यमातून हे पैसे गोळा केले. निवडणूक रोखे ही संकल्पना वाईट नसावी. पण त्याचं भ्रष्टाचाराचं रुपांतर भाजपाने केलं. ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामं देऊन त्यांच्याकडून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले.
हेही वाचा – १० वी १२ वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! जाणून घ्या कधी लागणार निकाल?
पंतप्रधान भ्रष्टाचाराचं समर्थन करतात. १० हजार कोटींचं निवडणूक रोखे भाजपाच्या खात्यात जमा झाले. चंदा लो धंदा लो या नितीने सरकारने अशा ठेकेदारांना काम दिलं जे ब्लॅकलिस्टेड होत्या, त्यांच्यावर सीडीआय, सीबीआय, इन्कम टॅक्सची कारवाई सुरू होती. ही कारवाई थांबवण्यासाठी देणगी घेतल्या जातात आणि या देणग्यांचं मोदी समर्थन करतात. या भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याकरता मोदी निवडणुकीआधी इंटरव्ह्यु देतात, असंही संजय राऊत म्हणाले.
मोदींनी १० वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. ५६ इंचाची त्यांची छाती आहे, त्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो. पण त्याचं मोजमाप खरं असावं, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.