हनुमान चालिसा पाकिस्तानात म्हणायची का? देवेंद्र फडणविसांचा ठाकरेंना सवाल
Devendra Fadnavis | अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणांना आज निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी दसरा मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे नवनीत राणा यांना आशीर्वाद दिला आहे. सत्याचा विजय झाला आहे. जे आजवर या मुद्यावर पोपटासारखे बोलत होते, ते खोटे ठरले आहेत. विरोधकांच्या तोंडावर बसलेली ही चपराक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा आशीर्वाद त्यांना मिळाला, आता जनतेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद मिळून प्रचंड मतांनी या ठिकाणी खासदार होणार आहेत.
हेही वाचा – म्युच्युअल फंडात कोट्यावधी..राहुल गांधी यांची एकुण संपत्ती किती?
नवनीत राणांच्या विरोधात कुमी कितीही बोलले, तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांनी पाच वर्षांत केलेली कामे जनतेसमोर आहेत. कुणी कितीही दुषणे दिली, तरी त्यांची चिंता करू नका. त्यांना हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. केवळ हनुमान चालिसाचे पठण करणार म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी नवनीत राणा यांना १४ दिवस तुरूंगात ठेवले. बारा तास कोठडीत उभे ठेवले. आपल्या देशात हनुमान चालिसा म्हणायची नाही, तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
आम्हाला हिंदू समाजाच्या शक्तीला संपवायचे आहे, असे राहुल गांधी म्हणतात. हिंदू समाजातील शक्ती म्हणजे काय, तर येथील अंबादेवी, दुर्गामाता ही हिंदू समाजाची शक्ती आहे. सर्व मातृशक्ती ही ख-या अर्थाने आम्ही शक्ती मानतो. ते या शक्तीला संपविण्याची भाषा करताहेत. पण तुमच्यासारखे किती आले आणि गेले, या शक्तीला कुणी संपवू शकले नाही. महाविकास आघाडी संपेल, पण आम्हाला कुणी संपवू शकत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.