दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे विज बिलाच्या वसूलीसाठी सक्ती कशाला?
- धनंजय मुंडेंचा उर्जामंत्र्यांना सवाल
मुंबई – दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी आधिच संकटात असताना त्याला आधार आणि मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांकडील विजेची थकबाकी सक्तीने वसुल करण्याचे आदेश कसे काय देता? असा सवाल करतानाच सक्तीची विज बिल वसुली थांबवून शेतकऱ्यांचे विज बील माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
मराठवाड्यासह राज्यातील सर्वच भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे गेली आहेत. अशावेळी उपलब्ध थोड्याशा शेतातील पाण्यावर पिके जगवण्याची शेतकऱ्यांना शेवटची आशा उरली आहे. शेतकरी हि पिके जगवण्याचा प्रयत्न करत असतानाच महावितरणच्या संचालकांनी 19 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंत्यांना एक पत्र पाठवुन शेतकऱ्यांकडील कृषी पंपाची, विजेची थकबाकी 3 हजार रूपये, 5 हजार रूपये याप्रमाणे वसुली करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. सदर आदेश हे उर्जामंत्र्यांसोबत 18 ऑगस्ट रोजी झालेल्या एका बैठकीनुसार काढण्यात आल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
शासनाच्या या सक्तीच्या सावकारी वसुलीबाबत धनंजय मुंडे यांनी एका ट्विटरद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. दुष्काळ जाहिर करून त्यांना वेगवेगळी मदत देणे आवश्यक असतांनाच महावितरण सक्तीने वसुली कशी करू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हजारो कोट्यावधी रूपये घेवुन उद्योगपती रोज एक याप्रमाणे पळुन जात असतांना ते सरकारला दिसत नाहीत आणि शेतकऱ्यांकडील पाच, दहा हजार रूपयांची वसुली करण्याचेच कसे काय सुचते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
वील बील माफ करा!
शेतकऱ्यांजवळ आज तीन हजार रूपयेच काय? एक रूपयाही भरण्यासाठी पैसे नाहीत. मागील काळातील नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, फसवी कर्जमाफी केली, पीक विमा मिळत नाही, महागाईमुळे ही शेतकरी त्रस्त झाला आहे, पीकवलेल्या मालाला हमी भाव मिळत नाही. चारी बाजुने शेतकरी संकटात सापडला असतांना महावितरणची ही सावकारी, जुलमी वसुली असल्याची टिका करून हे पत्रक तातडीने मागे घ्यावे. तसेच शेतकऱ्यांकडील सक्तीची विज बिल वसुली थांबवून त्यांचे विज बील माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.